ठाणे : येथील साद फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ ईस्ट यांच्या विद्यमाने अंबरनाथ पूर्व येथील शांताराम जाधव ज्येष्ठ नागरिक सभागृहात ‘संस्था बळकटीकरण’ या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यात ठाणे जिल्ह्यातील अनेक संस्थांचे विश्वस्त सहभागी झाले होते.
सामाजिक कार्य करण्याच्या दृष्टीने अनेक सामाजिक संस्था, मंडळ, प्रतिष्ठान, ट्रस्ट धर्मदाय आयुक्त कार्यालयात नोंदणी होतात; मात्र फार कमी संस्था आपल्या ध्येयधोरणानुसार संस्थेचे उद्दिष्ट पूर्ण करणारे उपक्रम यशस्वीपणे राबवतात. संस्था विश्वस्त, पदाधिकारी यांना पुरेसे मार्गदर्शन न मिळाल्यामुळे आपल्या क्षेत्रात कार्य करण्यास अडचणींना सामोरे जावे लागते. अशा संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसाठी ही कार्यशाळा घेण्यात आली.
सुरुवातीला ‘साद’च्या अध्यक्ष अॅड. पल्लवी यांनी ‘संस्थाचे बळकटीकरण’ या संस्थेच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाची प्रस्तावना मांडली. त्या म्हणाल्या, ‘प्रत्येक संस्थेची आपल्या कार्यक्षेत्रात समुदयासोबत काम करत असताना स्वतःची काही ध्येय व उद्दिष्ट्ये असतात. त्या उद्दिष्टांना समोर ठेऊन संस्था आपली कार्यप्रणाली निश्चित करत असते. संस्थेच्या विकासासाठी संस्थेची ध्येय व उद्दिष्ट्ये, तसेच त्या मागची संकल्पना स्पष्ट होणे गरजेचे असते.’
या पहिल्या कार्यशाळेत ‘कोरो’ या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या राहुल यांनी मार्गदर्शन केले. यात त्यांनी संस्था स्थापन करताना आपल्या क्षमतांवर संस्थेची उद्दिष्टे ठरवतनाच संस्थेत काम करणारे सहकारी विचाराने जोडले पाहिजेत, असे सांगितले.
शेवटच्या सत्रात संस्था बळकट होण्याच्या दृष्टीने नियोजन व कृती आराखड्याची मांडणी करण्याच्या दृष्टीने उपस्थित विश्वस्तांना थोडक्यात मार्गदर्शन करण्यात आले. सामाजिक संस्था व शासन मिळून सामाजिक बदलाची भविष्यकालीन प्रक्रियेची सुरुवात या कार्यशाळेच्या निमित्ताने होत असल्याची प्रतिक्रिया श्रुती क्षीरसागर यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वप्नील कांबळे, संदीप बारस्कर, प्रदीप पवार व साद युवा टीमच्या अश्विनी बापट, दत्तात्रय पाटील, सागर खरात, पूजा भोईर, संकेत पवार, शिखा, जगदीश यांचे सहकार्य लाभले.